बोगस कृषि निविष्ठा विक्रीला आळा घालण्यासाठी जिल्हयात १६ भरारी पथकांची स्थापना

जळगाव : खरीप हंगाम २०२४ जवळ येत असल्याने शेतकरी बांधवांना निविष्ठा वेळेवर उपलब्ध होण्यासाठी कृषि विभागाने तयारी सुरू केली आहे. खरीप हंगामात बोगस कृषी निविष्ठांची विक्री होऊ नये याकरीता जिल्हयात १६ भरती पथके तयार करण्यात आलेली असून या पथकांमार्फत बोगस बियाणे, खते व किटकनाशक विक्रीला आळा घालण्यात येणार आहे

कृषि विभागाकडून खरीप हंगाम २०२४ चे नियोजन करण्यात आले असून रासायनिक खते, बियाणे व किटकनाशकांच्या गुणवता नियंणासाठी जिल्हास्तरीय 1 व तालुकास्तरीय 15 असे एकुण 16 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे शेतकरी बाधवांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरित्या विक्री होणा-या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसण्यास मदत होईल. खरीप हंगाम सुरु झाल्यानंतर खते व बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी होते. या कालावधीत शेतक-यांची फसवणूक होऊ नये म्हणुन शेतक-यांनी गुणवत्ता व दर्जाची हमी देणा-या अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावे. बियाणे खरेदीची पावती, बियाणे पाकीटाचा टॅग व लॉट नंबर शेतकऱ्यांनी पडताळून पहावा.
पेरणी झाल्यावर बियाणे पाकिटे पिक निघेपर्यंत जपून ठेवावे, अनधिकृत / बिनाबिलाने बियाणे खरेदी करू नये, किटकनाशक, तणनाशके खरेदी करतांना त्यांची अंतिम मुदत तपासून घ्यावी, खत खरेदी करतांना रितसर बिल घ्यावे, जर कुणी खत विक्रेता जास्त दराने युरीया सारख्या अनुदानित खतांची विक्री करीत असेल तर त्याबाबत लेखी तक्रार तालुका कृषि अधिकारी किंवा कृषि अधिकारी, पंचायत समिती या कार्यालयास करावी, तसेच एचटीबीटी कापूस वाणाचे अवैधरीत्या व बिना बिलाने खरेदी करु नये. अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी ०२५७-२२३९०५४ किंवा मोबाईल क्रमांक ९८३४६८४६२० यावर माहिती द्यावी, असे आवाहन कु.मु.तडवी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *