धारावीच खरे मेक इन इंडिया! काँग्रेस नेते राहुल गांधींनी धारावीकरांसह चर्मकारांशी साधला संवाद.

राहुल गांधी यांच्या दौऱ्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने धारावी परिसरात जमले होते. राहुल यांना पाहण्यासाठी स्थानिक रहिवाशांनीही मोठी गर्दी केली होती. सुरक्षेचा अडसर असतानाही राहुल यांनी स्थानिकांशी संवाद साधला.धारावी पुनर्विकासाचा मुद्दा तापलेला असताना विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी धारावीकरांना भेट दिली. ‘ही धारावी तुमची आहे, ती तुमची राहायला हवी, जे कौशल्य धारावीकरांकडे आहे त्याला जागतिक मान्यता मिळायला हवी, धारावी हेच खरे ‘मेक इन इंडिया’ आहे ते भारताचे उत्पादन केंद्र व्हायला हवे,’ असे प्रतिपादन त्यांनी धारावीमधील सर्वसामान्य तसेच, चर्मकारांशी संवाद साधताना केले. तुमच्यासारखेच लोक देश घडवतात यावर विश्वास असल्याचेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी गुरुवारी महाराष्ट्र दौऱ्यावर होते, त्या वेळी त्यांनी धारावीकरांना भेट दिली. काँग्रेस नेत्यांसह खासदार वर्षा गायकवाड यांनी त्यांचे मुंबई विमानतळावर स्वागत केले. गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ते धारावीमध्ये आले होते. दीड ते दोन तास त्यांनी येथील चर्मोद्योग व्यावसायिकांशी तसेच स्थानिकांशी चर्चा करून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. चर्मोद्योग व्यवसायाची सद्यस्थिती कशी आहे, त्यांना कोणती आव्हाने भेडसावतात याचीही माहिती त्यांनी घेतली. या व्यवसायाला जागतिकस्तरावर न्यायचे असेल तर कौशल्यविकास प्रशिक्षण द्यायला हवे, असा आग्रह त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यासाठी लघुउद्योजकांना कोणत्याही प्रकारची मदत लागली तर आम्ही पाठिंबा देऊ, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले.राहुल गांधी धारावीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच धारावीकरांनी त्यांना पाहण्यासाठी एकच गर्दी केली होती.

त्यांनी धारावीमधील चामर स्टुडिओला भेट देत येथील उत्पादन, कलाकुसर, चामड्याच्या बॅगांची पाहणी केली. हा बॅण्ड विकसित करणाऱ्या येथील सुधीर राजभर यांच्याशी चर्चा केली. राजभर यांनी धारावीतील कारागिरांचे सुप्त कौशल्य ओळखून तयार केलेल्या बॅण्डला जागतिक स्तरावरही ओळख मिळाली आहे. राहुल यांनी त्यांच्या टीमसोबत गप्पा मारल्या. स्वतः मशीनवर बसून छोटी बॅग शिवण्याचा प्रयत्न केला. चर्मकार समाजाचे या कौशल्यास जागतिक स्तरावर मान्यता मिळावी यासाठी हा बॅण्ड विकसित केल्याचे राजभर यांनी सांगितले.सुरेंद्र कोरी यांची तिसरी पिढी राहते. राहुल यांनी अचानक त्यांच्या घरी भेट दिल्याने ते सुखावले. त्यांनी घरातील छोट्या मुलांचीही आस्थेने चौकशी केली. त्यांना टीव्हीवर पाहतो, प्रत्यक्ष पाहता आले, हा आनंद शब्दांत सांगता येत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कोरी हे मूळचे अमेठीचे असल्याने या भेटीला आनंदाची दुहेरी झालर असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.राहुल गांधी यांनी चर्मोद्योगातील लघुउत्पादकांशी चर्चा करून जायला निघाले त्यावेळी स्थानिकांनी त्यांना कलाकुसर असलेल्या चामड्याच्या बॅगा भेट दिल्या. राहुल यांनी त्या घेण्यासाठी नम्रपणे नकार दिला, त्यावर सोनिया गांधी आणि प्रियांकाजी त्या द्या, असा आग्रह केल्यानंतर त्यांनी त्या घेतल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *