पंचवीस वर्षापासून भाजी विक्रेत्या महिलांच्या दातृत्वाचा यज्ञ, विद्यार्थ्यांसाठी मोफत भाजीपाला देतात मायेचे हात.

जळगावमधील भाजी विक्रेता महिलांनी पंचवीस वर्षांपासून गरिब विद्यार्थ्यांना मोफत भाजीपाला देण्याची परंपरा सुरु ठेवली आहे. आठवड्यातून तीन दिवस सुमारे १२५ विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी या महिला योगदान देतात, ज्या स्वत: आर्थिक संघर्ष करत आहेत.भरभक्कम आर्थिक परिस्थितीत दातृत्वाची भावना असणे स्वाभाविकच आहे. मात्र, स्वत: ची परिस्थिती प्रतिकुल असताना पहाटे चार वाजेपासून रात्री ९ वाजेपर्यंत बाजारात रुपया-रुपयासाठी संघर्ष करणाऱ्या भाजीपाला विक्रेत्या महिलांनी गेल्या पंचवीस वर्षापासून गरिब विद्यार्थ्यांसाठी दातृत्वाचा यज्ञ अवरितपणे सुरु ठेवला आहे. जळगावातील विद्यार्थी सहाय्यक समितीमधील निवासी विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी जळगावच्या बाजारपेठेतील तब्बल ४० महिला आठवड्यातून तीन दिवस मोफत भाजीपाला देत आहेत.

विशेष म्हणजे समितीमध्ये त्यांच्यातील कुणाचाही मुलगा नसताना निस्वार्थी भावनेने ही सेवा सुरु आहे.सन २००० मध्ये समितीची लोकसहाभागातून सुरुवात झाली. तेव्हा ५ विद्यार्थी समितीमध्ये होते. तेव्हा दोन महिलांनी ’तुमच्या पुण्यात आमचाही खारीचा वाटा’, म्हणत सुरु केलेली परंपरा आजही सुरु आहे. सध्या समितीमध्ये १२५ विद्यार्थी तर मोफत भाजीपाला देणाऱ्या महिलांची संख्या ४० पर्यंत पोहचली आहे.समितीमध्ये मुलांच्या भोजनासाठी मेस सुरु केली. त्यात व्यापाऱ्यांकडून तेल, किराणा, पिठ मिळायला लागले. मात्र, भाजीपाल्यासाठी पैसे लागत होते. त्यावेळी डॉ. सुभाष राणे बाजारात गेले. त्यांनी अगदी सहज भाजीपाला विक्रेत्या महिला स्व. मंगला ताईं यांच्याशी चर्चा केली. गरिब विद्यार्थ्यांसाठी समितीचा कळवळा पाहून त्यांनाही मायेचा फाझर फुटला. त्यांच्यासह पाच महिला आठवड्यातून तीन दिवस मोफत भाजीपाला देण्यासाठी तयार केल्यात. तेव्हापासून पाच विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेला हा भाजीपाला विक्रेत्या महिलांच्या दातृत्वाचा यज्ञ आज समितीमध्ये सुमारे सव्वाशे विद्यार्थी असेपर्यंत अवरितपणे सुरु आहे. सोमवारी, बुधवारी व शनिवारी समितीमधील विद्यार्थी सायंकाळी बळीरामपेठेतील बाजारपेठेत पोते घेवून येतात. अवघ्या काही क्षणातच या महिलांच्या दातृत्वाने ताज्या भाजीपाल्याने पोते खचाखच भरते.

स्वत: ची परिस्थिती प्रतिकुल असतांनाही विद्यार्थ्यांसाठी भाजीपाला देणाऱ्या या महिलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी सहाय्यक समितीकडून काही वर्षांपूर्वी या महिलांचा भाऊबीजेला साडी-चोळी देवून सन्मान करण्याची सुरुवात करण्यात आली. मात्र, या महिलांनी या कार्यक्रमास देखील विरोध केला. आम्ही विद्यार्थ्यांसाठी मदत करतो. तु्म्ही लोकसहभागातून समिती चालवित आहात. त्यामुळे आम्हाला ही साडी चोळी नको. या खर्चातून देखील ज्या मुलांना शैक्षणिक शुल्क भरणे शक्य नसेल त्यांना मदत करा, अशी भूमिका घेत या माऊलींनी आपल्या दातृत्वाला आणखी झळाळी दिली.कोकीळा माळी, सुनंदा भालेराव, कमल मराठे, अहिल्या पाटील, लता माळी, अलका मराठे, मीना पवार, लता नेमाडे, निर्मला कोळी, कल्पना खाचणे, मंगला पाटील, सोनी मराठे, बंटी चौधरी, सरस्वताबाई पाटील, शैला महाजन, मालती कोल्हे, मंगला गोगले, कमल माळी, कमल पाटील, वत्सला सोनवणे, अलका पाटील, संगीता सावदेकर, सविता कोळी, चारुलता नारखडे, अलका सुर्यवंशी, संगीता काळे, कल्पना कांडेलकर यांच्यासह ४० दातृत्वशील महिलांचा समावेश आहे.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांची प्रेरणा घेवून प्रा.डॉ. सुभाष राणे यांनी सन २००० मध्ये भाड्याच्या इमारतीत लोकहभागातून समितीची सुरुवात केली. पहिल्या बॅचला केवळ पाच गरिब विद्यार्थी होते. समितीमध्ये निवासाची व भोजनाची सुविधा दिली जाते. त्यासाठी महिन्याला नाममात्र शुल्क म्हणून १०० रुपये घेतले जातात. शुल्क देखील विद्यार्थ्यांनी काही तास काम करुन कमवा शिका अंतर्गत मिळवावे लागते. पाच विद्यार्थ्यांवर सुरु झालेल्या समितीची आज स्वमालकीची ३६ खोल्यांची इमारत व अत्याधुनिक अभ्यासिका आहे. यात दरवर्षी १२५ ते १५० गरिब व होतकरु विद्यार्थी राहतात. बिकट परिस्थिती असलेल्या मुलांचे शैक्षणिक शुल्कही समिती दानशूर व्यक्तींकडून मिळवून देते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *