२६ आरोपींकडून ३५ मोबाइलचा वापर; बाबा सिद्दिकी प्रकरणात ४५९० पानांचे आरोपपत्र दाखल

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी २६ आरोपींविरुद्ध चार हजार ५९० पानांचे आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी २६ आरोपींविरुद्ध चार हजार ५९० पानांचे आरोपपत्र सत्र न्यायालयात दाखल केले. पोलिसांनी या आरोपपत्रामध्ये २१० साक्षीदारांचे जबाब जबाब नोंदविले असून अटक आरोपींकडून तब्बल ३५ मोबाइल फोन जप्त करण्यात आले आहे. लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल याच्यासह तिघांना फरार दाखविण्यात आले असून ठोस हेतू स्पष्ट झाला नसला, तरी तीन कारणे असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

वांद्रे भागातील निर्मल नगरमध्ये मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडत असताना १२ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गुन्हे शाखेच्या वेगवेगळ्या पथकांनी या प्रकरणाचा तपास करत २६ आरोपींना देशाच्या वेगवेगळ्या भागांतून अटक केली. एका टोळीने माघार घेतल्याने दुसऱ्या टोळीने सिद्दिकी यांची हत्या केल्याचे तपासातून समोर आले. या हत्येमागे बिष्णोई टोळीचा हात असल्याचे तपासातून स्पष्ट होताच, बिष्णोई बंधूंना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले. पोलिसांनी सोमवारी दाखल केलेल्या आरोपत्रामध्ये जीशान अख्तर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई यांना फरार दाखविण्यात आले आहे.पोलिसांच्या तपास पथकाने चार हजार ५९० पानांच्या आरोपपत्रामध्ये २१० साक्षीदारांचे जबाब नोंदविले असून या हत्याकांडात संपर्कासाठी ३५ मोबाइल फोनचा वापर करण्यात आल्याचे नमूद केले आहे. पोलिसांनी पाच बंदुकांसह ८४ जिवंत काडतुसे हस्तगत केली. सिद्दिकी यांच्या हत्येमागे ‘एसआरए’ योजनेंतर्गत सुरू असलेला पुनर्विकास असल्याचे म्हटले जात होते. मात्र या कारणपर्यंतचे कोणतेच पुरावे पोलिसांना सापडले नाहीत. आतापर्यंतच्या तपासामध्ये अभिनेता सलमान खानशी जवळीक, अनुज थापन या आरोपीने पोलिस कोठडीत केलेल्या आत्महत्येचा बदला आणि बिश्नोई टोळीबद्दल लोकांमध्ये भीती निर्माण करणे ही तीन प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *